गायीची निवड,
निवारा, खाद्य-पाणी व संगोपन
भारत हा कृषीप्रधान देश असून पशुसंवर्धन
मोठ्या प्रमाणावर युवा पिढीला रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. जनावरांचे
संगोपन हे दुग्धउत्पादन, मांसउत्पादन यांसाठी मुख्यत्वेकरून केले जाते. जर आपणांस
योग्य रीतीने दुग्धोत्पादनाच्या दृष्टीने जर व्यवसाय करावयाचा असेल तर खालील
बाबींचा शास्रोक्त पद्धतीने विचार करणे फायद्याचे ठरते.
गाई-म्हशींची
निवड :
दुग्धोत्पादनासाठी गाई / म्हशीची निवड
करतांना पुढील मुद्दे विचारात घेणे योग्य ठरेल
गाय / म्हैस ज्या
जातीची खरेदी करावयाची आहे, त्या जातीचे गुणधर्म, रंग, रूप, शरीराची बांधणी पहावे
तसेच वंशावळ पाहणे योग्य ठरेल.
गाई / म्हशींची
खरेदी पशुपालकाकडून करणे योग्य ठरेल शक्यतो आठवडी बाजारांतून खरेदी करणे टाळावे.
कारण पशुपालकाकडे जनावरांच्या नोंदी उपलब्ध असतात. जसे जन्म, गाभणकाळ, वेतातील
अंतर, सरासरी दूध उत्पन्न, पहिला माज, दिलेल्या वासरांची संख्या, लसीकरण, इत्यादी.
दलालामार्फत
बऱ्याचदा फसवणूक होते तसेच त्यांकडे कोणत्याही प्रकारच्या नोंदी नसतात म्हणून
दलालाकडून जनावरांची विक्री टाळावी
गाय / म्हैस हे
निरोगी असावे तसेच त्वचा मऊ व चमकदार असावी. नाकपुडी हि ओलसर असावी, यांवरून
जनावराला कोणत्याही रोगाची लागण नाही असे निदर्शनास येते
गाय / म्हशींचे चार
हि सड सारख्या आकाराची असावीत व हातात धरून दूध काढण्यास योग्य असावीत. जर चार
पेक्षा जास्त सड असेल तर असे जनावर घेणे टाळावे.
चारही सडातून दूध
येते का ? जनावर दूध काढतांना त्रास देते का ? हे तपासून घेणे आवश्यक ठरेल.
जनावरांची कास मऊ असावी तसेच लोंबणारी नसावी.
गाई-म्हशींच्या
काही वेगळ्या सवयी असतील तर पशुपालकांकडून त्यासंबंधी माहिती करून घेणे फायद्याचे
ठरते. जसे, दुध काढण्याच्या वेळा, दिला जाणारा खुराक ई.
गाय / म्हशींची
खरेदी करत असतांना त्या गाभण किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताच्या घ्याव्यात.
सरासरी त्यांचे वय हे चार वर्षांपर्यंत असावे.
जनावरांचे डोळे
हे कायम चकचकणारे शुभ्र, पाणीदार, पांढरे असावेत. त्वचेला जर स्पर्श केला असता
त्याक्षणी त्वचा मऊ गरम लागायला हवे
निरोगी जनावर हा
कायम कान टवकारून, लक्ष वेधून, चाणाक्षपणे बसलेला असतो तसेच कमरेची हाडे दूर
असावीत त्यामुळे गर्भाची वाढ व प्रसूती व्यवस्थित होते
निरोगी जनावर हे
मस्त, हुंदळत चालते तर रोगी जनावर मंद स्थितीत एकाच जागेवर बसून राहते
जनावर खरेदी
करण्यापूर्वी थोडे अंतर चालवून पहावे जेणेकरून पायांत किंवा चालण्यात काही दोष
असेल तर तो निदर्शनास येईल
पुढील दोन पायांमध्ये
व छातीजवळ योग्य व भरपूर अंतर असावेत मागील पायांतही कासेच्या योग्य ठेवणीसाठी
भरपूर अंतर असावेत
चारही पायांचे
खुर समतोल, रुंद व सपाट असावेत. खुरे वाढलेली नसावीत
कोणत्याही
संसर्गजन्य रोगाची साथ चालू असतांना बाजारातून गाय – म्हशींची खरेदी करणे टाळावे.
एकाच बाजारात
जास्त संख्येने गायी / म्हशी खरेदी करण्याची योग्य वेळ म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर
ते डिसेंबर पर्यंत असतो कारण या कालावधीत गाय-म्हशी जास्त प्रमाणामध्ये वितात आणि
विक्रीसाठी बाजारात आणल्या जातात
निवारा :
हवामानाचा विचार केला तर भौगोलिक परिस्थितीनुसार भारतात विषमता जाणवते.
स्थानिक, भौगोलिक परिस्थिती व हवामान या तिहेरी घटकांचा विचार करून दुभत्या गाई /
म्हशींना निवारा उपलब्ध करणे अत्यावश्यक असते.
गोठा बांधतांना
भविष्यातील गाई-म्हशींची संख्या याचा विचार करून आराखडा तयार करावा. तोंडासमोर
तोंड किंवा शेपटीकडे शेपटी अशा दोन पद्धतीने गोठ्याची बांधणी करता येते तसेच
गाई-म्हशींना व्यायामासाठी मोकळी जागा असावी व गोठयाजवळच कुंपण घालून आवार तयार
करावे त्यासाठी चौकटी जाळी वापरावी, काटेरी तार वापरू नये जेणेकरून जनावरांस इजा
होणार नाही
·
जनावरांचे गोठे :
गोठ्यात भरपूर उजेड येईल व हवा खेळती राहील अशा टिकाणी गोठे असावेत, त्याच प्रमाणे गोठे उंचावर असावेत. गोठ्यात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश असावा, गव्हाणी ही टिकाऊ व पक्क्या असावेत. गोठ्याचे छप्पर मध्यभागी १५ फूट व बाजूस ६ ते ८ फूट असावे. जमीन पक्की असावी जनावरांच्या मागच्या बाजूस गोठा उतरता असावा व शेवटी मुत्रवाहक नाली असावी. त्याचप्रमाणे प्रत्येक जनावरासाठी साधारणतः ६५ ते ७५ चौ.फूट जागा असावी. गोठा धुतल्यानंतर पाणी शेताला जाईल अशी व्यवस्था करावी, जेणेकरून शेतीस ही त्याचा सदुपयोग होईल
संतुलित आहार :
दुग्धव्यवसायात जनावरांना दिला जाणारा आहार व त्याची गुणवत्ता योग्य असेल
तरच गाई / म्हशी सुदृढ व निरोगी राहतील. त्यांना आहारात हिरवा चारा, सुकी वैरण व
पशुखाद्य हे गरजेनुसार दिले गेले पाहिजे. गाई-म्हशींची शुष्क आहाराची दैनंदिन गरज
त्यांच्या शारीरिक वजनाच्या २.५ ते ३ टक्क्यांपर्यंत असते. आहाराचे नियोजन करतांना
त्यातील पचनीय पदार्थांचे प्रमाण, त्यांची चव, त्यांतील अन्नघटक यांचा तसेच बाजार
भावाचा विचार करावयाला हवा. त्यांत प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, क्षार, व
जीवनसत्वे या सर्वांचा समावेश असावा.
गाईचे वजन जर ४०० किलो असेल तर शुष्क
आहार १२ किलोपर्यंत द्यावा. त्यांपेकी दोन तृतीयांश भाग हिरवा चाऱ्याच्या स्वरुपात
तर एक तृतीयांश भाग वैरणीच्या स्वरुपात दिला गेला पाहिजे. चारा हा कुट्टी करूनच
दिला गेला पाहिजे, जेणेकरून चाऱ्याचा अपव्यय होणार नाही म्हणजेच चारा वाया जाऊन
नुकसान होणार नाही.
गाई-म्हशीच्या
प्रत्येक लिटर दुधासाठी ३०० ते ४०० ग्राम पशुखाद्याची गरज असते. दुभत्या
गाई-म्हशीच्या दुधातून दररोज केल्शियम, फॉसरस बाहेर पडतो त्यामुळे त्याची भरपाई
खाद्यासमवेत ५० ते १०० ग्राम
क्षारमिश्रण देऊन केली पाहिजे.
आहार देण्याच्या
वेळा :
दुभत्या गाई-म्हशींना दिवसातून चार ते
पाच वेळा चारा, वैरण घालावी व पशुखाद्य सकाळी व सायंकाळी अशा दोन्ही वेळेस धारा
काढतांना दुध उत्पादनाच्या प्रमाणानुसार दिले गेले पाहिजे. आहारातील क्षारांची गरज
भागविण्यासाठी गोठ्यात क्षारांच्या चाटणविटा खुंट्याना लावून गव्हाणीजवळ ठेवाव्यात
निरीक्षण :
जनावरांचे पशुपालकाकडून दररोज दोन वेळा
गोठ्यात निरीक्षण केले गेले पाहिजे. जेणेकरून कळपातील जनावरांच्या लक्षणावरून
बऱ्याचशा गोष्टींचे निदान होते. जसे, माजाच्या लक्षणांवरून जनावर माजावर आहे असे
समजते. जनावर जर आजारी असेल तर खाद्य – पाणी व्यवस्थित सेवन करत नाही तसेच मंद
स्थितीत एकाच जागेवर बसून राहते.
माजावर आलेल्या जनावरांची लक्षणे:-
१.
जनावर दुसऱ्या जनावर उडते किंवा स्वत उडू देते
२.
जनावर अस्वस्थ स्थितीत असते
३.
योनीमार्ग सुजलेला व किंचित लालसर दिसतो
४.
योनीमार्गातून पांढरा / काचेसारखा चिकट स्त्राव
बाहेर पडतो
५.
जनावर वारंवार हंबरते
६.
जनावर वारंवार लघवी करते
७.
जनावर शेपटी हलवते
८.
वळूबद्दलची आतुरता वाढते. कधी-कधी वळूच्या
शोधात लांबवरचा प्रवास करते
९.
खाद्याकडे व पाणी पिण्याकडे अजिबात लक्ष नसते
१०.
दूध देण्याचे प्रमाण कमी होते
११.
डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारित झालेल्या
दिसतात.
जनावरातील माजाचे ऋतुचक्र :-
गाय व म्हैस एकदा माजावर
आली असे दिसता तिला भरविले नाही किंवा ती गाभण राहिली नाही तर पुन्हा २१ दिवसांनी
जनावर माजावर येते. माजावर आल्यानंतर १२-२४ तासांच्या वेळेत कृत्रिम रेतन पद्धतीचा
अवलंब करून जनावर भरविल्यास गाभण राहण्याचे प्रमाण ७० टक्केपर्यंत असते म्हणून गाय
व म्हैस माजावर आल्यानंतर वेळेत भरवून घ्यावी म्हणजे साधारणता सकाळच्या वेळी
माजावर आल्यास सायंकाळी व दुसऱ्या दिवशी सकाळी भरवावे आणि जर सायंकाळी माजावर आले
असता दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी भरवावे.
जनावरांतील माजाबद्दलच्या काही महत्वाच्या बाबी :-
१.
काही जनावर माजावर असताना सुद्धा काही
बाह्यरूपी लक्षणे दाखवीत नाही अशा अप्रत्यक्ष माजाला मुक्त माज किंवा व्यक्त न
होणारा माज असे म्हणतात
२.
साधारणता रात्री ८ ते सकाळी (पहाटे) ५ पर्यंत
जनावर माजावर येण्याचे प्रमाण जास्त असते
३.
काही संकरीत गायी – म्हशींच्या जातींमधी
तिसऱ्या ते चौथ्या दिवशी थोडा रक्तस्त्राव बाहेर येतो
४.
३ ते ५ टक्के
काही गाभण गायी सुद्धा माज दाखवितात
५.
४० ते ४५ टक्के गायी माजावर नियमितपणे येतात तर
१० ते १५ टक्के माजावरच येत नाहीत
६.
चांगला, सकस आहार, उत्तम पोषण आणि देखभालाची
आवश्यकता जनावर नियमित माजावर येण्यासाठी असते
७.
नसबंदी केलेल्या वळूच्या साह्यानेही माज ओळखणे
सोपे जाते
८.
कृत्रिम रेतन जनावरात योग्य वेळीच करावे किंवा
नैसर्गिक पद्धतीने योग्य वेळीच वळू दाखवावा
९.
२ ते ३ वेळा जनावर माजावर येऊन सुद्धा गाय व
म्हैस गाभण राहत नाही असे निदर्शनास आल्यास लैंगिक तपासणी व योग्य तो उपचार
पशुवैद्यकीयांकडून करून घ्यावा.
जनावर माजावर न येण्याची मुख्य कारणे :-
१.आहार :-
जनावरांना
दिला जाणारा हिरवा चारा व सकस आहार, पोष्टिक खाद्य याला फार महत्व असते. हिरव्या
चारयात असणारी जीवनसत्वे मुख्यता : अ जीवनसत्व, आहरातून मिळणारी खनिजे व जनावरानची
एकंदरीत तब्येत हे जनावर माजावर येण्यासाठी गरजेचे व आवश्यक असते.
तुलनात्मक
विचार करता उन्हाळ्यात हिरवा चार काय तर पोटभर सुका चारा किंवा खाद्य मिळणे कठीण
असते. अशा परीस्थितीत जनावर माजावर येणे अवघड असते.
२.वांझपणा :-
जनावरांतील
आनुवंशिकता व वारंवार असणारे आजार तसेच प्रजनन इंद्रियातील बिघाडामुळे कायम किंवा
तात्पुरत्या स्वरूपाचा वांझपणा उदभवतो.
मुद्देसूद
नियमित नोंद ठेवून आणि सतत असणारी चौकशी यांमुळे बऱ्याच प्रमाणातील प्रश्न सुटण्यास
मदत होईल. त्याकरिता खालील मुद्दे महत्वाचे आहेत-
Ø गाय माजावर केव्हा आली
Ø गाय केव्हा व्यायली
Ø वितांना कोणत्या अडचणी
आल्या
Ø त्यावेळी कोणती औषधी
देण्यात आली
Ø व्याल्यानंतर पुन्हा
माजावर केव्हा आली
Ø गाभण राहण्यासाठी किती
वेळा भरवावी लागली
Ø जनावरातील भाकड काळ किती
होता
Ø दोन वितातील अंतर किती
होते
Ø वापरलेल्या वळूची सविस्तर
असणारी माहिती इ.
जर गायीचा
एक माज ओळखण्यात असक्षम ठरल्यास तर भाकडकाळ हा पुढील २१ दिवसांनी लांबतो. मग
तेवढ्या दिवसांचा पालन पोषणाचा खर्च अधिक वाढतो आणि गायीपासून वासरांची संख्या हि
कमी मिळते.
अशाप्रकारे
जनावरांतील माज त्यांच्या लक्षणावरून योग्य रीतीने ओळखल्यास नियमित प्रजनन होण्यास
मदत होईल आणि जास्तीत जास्त वासरे जन्माला येतील व शेतकऱ्याचा जास्तीत जास्त फायदा
होईल
नाळ कापतांनी
घ्यावयाची निगा व काळजी:
१.नवजात वासरू बाहेर आल्यानंतर त्याला
स्वच्छ करून घ्यावे व त्याची नाळ हि बेंबीपासून
दीड ते दोन इंच लांब ठेवून निर्जंतुक केलेल्या कात्रीच्या साह्याने कापून घ्यावी
२.कापलेल्या भागाच्या त्तोंडावर टिंक्चर
आयोडीन या औषधाचा बोळा घट्ट बांधून घ्यावा
३.दोन दिवसांच्या कालावधीनंतर बोळा
सोडून घ्यावा
४.नंतर त्यावर बेन्झींनचा बोळा सील
करावा
५.जेणेकरून हळूहळू नाळ सुकून जाते
त्यानंतर ४-५ दिवसांनी बेंबीजवळ खोबऱ्याच्या तेलाचा
बोळा लावावा त्यानंतर पंधरा दिवसांच्या आतच नाळ आपोआपच गळून जाते
वरील सर्व गोष्टी
पशुवैद्यकीयांच्या सल्य्याने कराव्यात
·
वासरांचे संगोपन : वासरू जन्मल्यानंतर गाय त्याच्या नाकातील कानातील व तोंडातील सर्व चिकट पदार्थ स्वच्छ करते. वासराचे कोवळे खूर लवकरात लवकर काढावेत. जर नाळ आपोआप तुटली नसल्यास तर वासराच्या २ ते ३ सेंटीमीटर अंतरावर आयोडीन मध्ये भिजवलेल्या दोऱ्याने घट्ट बांधून त्या पुढील भाग निर्जंतुक केलेल्या कात्रीने कापावा व त्यानंतर त्यावर दिवसातून २ ते ३ वेळा आयोडीन द्रावण लावावे. वासरू जन्मल्यानंतर सुमारे एक तासाच्या आत त्याला त्याच्या वजनाच्या ८ ते १० टक्के आईचा चिक पाजावा, तसेच प्रतिदिवस याच प्रमाणात दुध पाजावे, शिंगे वाढू नयेत म्हणून ७ ते १० दिवसाच्या आत शिंगे काढावीत किंवा लाल तापलेल्या लोखंडाने शिंगे नाहीसे करावीत. वासराला दुध पाजाल्यानंतर थोडा वेळ तोंडाला मुसकी बांधावी.
·
माजावर आलेल्या गायीला केव्हा भरावे : गाय सुमारे २१ दिवसांच्या अंतराने माजावर येते,माजाचे लक्षणे दिसल्यापासून सुमारे १० ते १८ तास भरवावे काही वेळेस २० ते २१ दिवसांनी सुद्धा जनावर माज दाखवत नाही व काही जनावरे दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यात माजावर येतात. अशा गाईची पशुवैद्यकीयांकडून तपासणी करून औषधोपचार करून घ्यावा.
·
गाभण गाईचे संगोपन :
गाभण गाईंना शेवटच्या अडीच महिन्यांच्या काळात दीड किलो समतोल खाद्याचा ज्यादा पुरवठा करावा. विण्यांच्या अगोदर मोकळे फिरायला द्यावे, प्रत्यक्ष गाई विण्यांच्या वेळी दुरूनच तिच्यावर लक्ष ठेवावे. गोठ्यात टोकदार दगड व खिळे असू नयेत .
अशा प्रकारे जर जनावराच्या वाढीच्या विविध टप्प्यानुसार
काळजी घेतली तर जास्तीत जास्त फायदा करून घेता येऊ शकतो.
लसीकरण :
जनावरांना रोगाची लागण होऊ नये याकरिता
वेळेअगोदरच लसीकरण केले गेले पाहिजे. मुख्यत्वेकरून जनावरांत घटसर्प, फऱ्या,
लाळ्या-खुरकत, फाशी(काळ पुळी), ब्रुसेलोसीस, आय. बी. आर, थायलेरियासीस हे रोग होऊ
नये म्हणून लसीकरण करणे गरजेचे असते. नाहीतर आजाराला बळी पडून दुग्धोत्पादनावर
त्याचा फार मोठा परिणाम घडून येतो.
पशुवैद्यकीय
सल्ला :
कोणत्याही आजाराचे लक्षण निदर्शनास आल्यास तसेच एखाद्या जनावराचे विसंगत
लक्षण जाणवल्यास ताबडतोब पशुवैद्यकीयांच्या सल्ल्याने उपचार करून घेणे अत्यावश्यक
असते.
वरील दिलेल्या बाबींचा विचार करून
दुग्धव्यवसायाची सांगड घातलीत तर चांगले, दर्जेदार दुग्धोत्पादन पशुपालकाला
मिळविता येऊ शकते.
प्रा. अजय गवळी (८००७४४१७०२)
No comments:
Post a Comment